५०० किलो प्लास्टिक जप्त ५६ हजार रुपयांचा दंडमनपा उपद्रव शोध पथकाची कारवाई

५०० किलो प्लास्टिक जप्त  
५६ हजार रुपयांचा दंड
मनपा उपद्रव शोध पथकाची कारवाई

अकूंश अवथे चंद्रपूर 
 
चंद्रपूर ११ जुलै  - चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सराई मार्केट जवळील आरको गोडाऊन येथे धाड टाकुन   केलेल्या कारवाईत ५०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असुन ५६ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. सदर कारवाईत प्रतिबंधित स्वरूपाचा मोठा प्लास्टिक साठा आढळल्याने दंड वसुल करण्यात आला असुन दुकानात पुन्हा प्लास्टिक आढळल्यास पोलीस तक्रार करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.
       एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.
       चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिलेले असुन प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमाअंतर्गत मनपाच्या तीनही झोननिहाय कारवाईत संयुक्तपणे मोहीम राबवून शहरातील व्यवसाय प्रतिष्ठाने, दुकाने यांची कसून तपासणी करण्यात येत आहे.  
      प्लास्टिक बंदीसाठी मनपा मार्फत " उपद्रव शोध पथक " ( NDS ) तयार करण्यात आले असुन सदर पथकाद्वारे पालिका क्षेत्रातील सर्व प्रतिष्ठाने, दुकानांवर कारवाई सुरु आहे.दरम्यान प्लास्टिक पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास ५ हजारांचे बक्षिस दिल्या जात आहे.आतापर्यंत अनेकांनी मनपाच्या या योजनेचा लाभ घेतला असुन प्लास्टिक मुक्त चंद्रपूरसाठी गुप्त माहिती देण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे

Comments