युवकांनो भावी आयुष्यात देशसेवा करा : नयोमी साटम**कारगिल विजय दिवस निमित्त केले आवाहन*

*युवकांनो भावी आयुष्यात देशसेवा  करा : नयोमी साटम*
*कारगिल विजय दिवस निमित्त केले आवाहन*

 वरोडा: शाम ठेंगडी
     देशाच्या सीमेवर भारतीय जवान कणखरपणे उभे असल्यामुळेच देशात आपण सुख समाधानाने जीवन जगत आहोत. त्यामुळे जवानांच्या शौर्याचा आपणास आदर असला पाहिजे. देशाच्या रक्षणार्थ ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण करत
 देश रक्षणाच्या यज्ञात ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना विसरता येणार नाही. आपण आपल्या आयुष्यात जे काही बनाल त्यातून देशसेवा कशी करता येईल याचा विचार युवक-युवतीनी करावा असे आवाहन येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी आज केले. त्या आज कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.
    जिल्हा पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, स्थानिक माजी सैनिक संघ, एअरबोर्न ट्रेनिंग सेंटर, स्वर्गीय मोरेश्वरराव टेमुर्डे चारिटेबल ट्रस्ट ,बेस्ट सेक्युरिटी एजन्सी वरोरा व पैगाम साहित्य संघ  यांच्या संयुक्त विद्यमाने आज 26 जुलै रोज शुक्रवारला येथील शहीद योगेश डाहुले चौकात कारगिल युद्धात स्वतः वीरगती पत्करून आपल्याला विजय मिळवून देणाऱ्या युद्ध्यांना आदरांजली वाहण्याकरिता कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. 
            येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक व वरोडा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरीचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, रिटायर्ड सेवानिवृत्त कॅप्टन वामन निब्रड, एअर बोर्न सेंटरचे अध्यक्ष अमन टेमुर्डे,शहीद योगेश डाहूले यांचे माता पिता हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
      या कार्यक्रमापूर्वी शहीद योगेश डाहुले चौकातून *वीर जवानों की शत नमन रॅली* काढण्यात आली. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून फिरत कार्यक्रम स्थळी परत आली. यानंतर नयोमी साटम व माजी सैनिक व नागरिकांनी शहिदांच्या स्मारकावर आपली आदरांजली वाहिली. शत नमन रॅलीत शहरातील सर्वच शैक्षणिक संस्थातील विद्यार्थी सहभागी झाले होते व हे विद्यार्थी देशभक्तीपर नारे देत होते.
             यानंतर झालेल्या कार्यक्रमात वायुसेनेतून सेवानिवृत्त झालेले दिगंबर खापणे यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी कारगिल युद्धाची विस्तृत माहिती कथन करत उपस्थित युवक युवतींना शासनाने आणलेल्या अग्नीवीर योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले.अग्नीवीर योजना ही देशासाठी एक चांगली योजना असून अग्नीवीरांना केंद्रीय शासनाने सर्वच नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले असल्याचे  सांगितले.
       वैभव निमकर यांनी कार्यक्रमाचे संचलन व उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर पुरुष व महिला उपस्थित होते .
-------------------------------------
योगेश डाहूले चौकातील हा  कारगिल विजय दिवस  येथील उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.तसेच या कार्यक्रमाला वरोडा नगर परिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी गजानन भोयर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते. निमंत्रण पत्रिकेत तसा उल्लेख हि होता. परंतु ते उपस्थित राहू शकले नाही.त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा ऐकावयास मिळाली.
-------------------------------------

Comments