महिन्याअखेरीस तयार होणार ईरई नदी पात्रालगतचे विसर्जन कुंडगणपती आणि दुर्गादेवीच्या मोठ्या मुर्तींची विसर्जनाची होणार व्यवस्थाआयुक्तांनी केली कामाची पाहणी

महिन्याअखेरीस तयार होणार ईरई नदी पात्रालगतचे विसर्जन कुंड
गणपती आणि दुर्गादेवीच्या मोठ्या मुर्तींची विसर्जनाची होणार व्यवस्था
आयुक्तांनी केली कामाची पाहणी

अकूंश अवथे चंद्रपूर 
5/7/2024

चंद्रपूर ०५ जुलै  -  आगामी गणेशोत्सव व इतर उत्सवांचा काळ पाहता विसर्जन व्यवस्था सुरळीत होण्याच्या दृष्टीने ईरई नदी पात्रालगत मोठे विसर्जन कुंड तयार केले जात असुन गणपती आणि दुर्गादेवीच्या मोठ्या मुर्तींची विसर्जन व्यवस्था येथे होणार आहे.जुलै महिन्याअखेरीस विसर्जन कुंडाचे काम पुर्ण होणार असुन आज मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी या बांधकामाची पाहणी केली.
     मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यापासुन दाताळा रोडवरील रामसेतु पुलालगतच्या जागेत विसर्जन स्थळी मोठे विसर्जन कुंड तयार करण्याच्या कामाची सुरवात करण्यात आली होती. तयार होणाऱ्या या विसर्जन कुंडाची क्षमता अंदाजे ३० लाख लिटर पाण्याची असुन ८१३७ स्केयर फुट क्षेत्रफळ आहे. १० फुट पर्यंत उंची असलेल्या मूर्तींचे यात विसर्जन करता येणार आहे. एकावेळेस २ मोठी वाहने उभी राहण्यास २ वेगवेगळे प्लॅटफॉर्म बनविण्यात आले असुन क्रेनच्या साहाय्याने मोठ्या मूर्तींचे विसर्जन करता येणे शक्य होणार आहे. या विसर्जन कुंडांद्वारे अधिकाधिक मोठ्या मूर्तींचे विसर्जन हे कुंडात करण्यात येणार आहे. नदीतील विसर्जन बंद झाल्याने मोठ्या मूर्तींच्या विसर्जनास अडथळा निर्माण होणार नसुन नदी प्रदूषणासही चाप बसणार आहे.      
  
     शहरात गणेशोत्सव व दुर्गादेवी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. विशेषतः गणेशोत्सव काळात अनेक मंडळांद्वारे मोठ्या मुर्तींची स्थापना केली जाते. मूर्ती मोठी असल्याने जिथे पाणी अधिक प्रमाणात उपलब्ध असेल तिथे विसर्जन करण्याकडे कल असतो. पुर्वी रामाळा तलावात मोठया प्रमाणात मूर्तींचे विसर्जन केले जायचे मात्र तलाव प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने श्रीगणेश व दुर्गादेवी मूर्ती विसर्जन रामाळा तलावात न करता विसर्जनाची व्यवस्था ईरई नदी पात्रालगत करण्यात येते.
     मागील वर्षी सर्व मोठ्या मूर्तींचे विसर्जन हे ईरई नदीत करण्यात आले होते.विसर्जन स्थळी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती,परंतु नदीतील पाणी नैसर्गिकरीत्या कमी झाल्याने विसर्जनास अडथळा निर्माण झाला होता.नदीवर बंधारा बांधुन त्याद्वारे पाणी अडविण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता, परंतु त्यास यश प्राप्त झाले नव्हते.यावर उपाययोजना म्हणुन विसर्जन स्थळी मोठ्या मूर्तींसाठी विसर्जन कुंड तयार करण्यात येत आहे.

Comments