वन विभागाला प्रत्येक क्षेत्रात ‘नंबर वन’ करा!**वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन**नागपूरमध्ये महिला वन कर्मचारी व अधिकारी परिषदेचे आयोजन*

*वन विभागाला प्रत्येक क्षेत्रात ‘नंबर वन’ करा!*

*वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन*

*नागपूरमध्ये महिला वन कर्मचारी व अधिकारी परिषदेचे आयोजन*

चंद्रपूर,दि.१ : राज्यामध्ये असलेल्या एकूण सर्व विभागांपैकी सर्वात मोठी जबादारी वन विभागावर आहे. देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत वन विभागाचे सर्वाधिक बजेट महाराष्ट्राचे आहे. वन संवर्धन, संरक्षण हे ईश्वरीय कार्य आहे, यामध्ये ‘आई’ प्रमाणे अत्यंत निष्ठेने आणि जबाबदारीने काम करणाऱ्या महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांचा अभिमान वाटतो. आता प्रत्येक क्षेत्रात वन विभागाला नंबर वन करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे या, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
सदर (नागपूर) येथील नियोजन भवन सभागृहात आयोजित महिला वन कर्मचारी व अधिकारी परिषदेत ते बोलत होते. वन विभागाद्वारे आयोजित महिला अधिकारी कर्मचारी यांच्या परिषदेला उपस्थित प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता विश्वास, प्रधान मुख्य वन संरक्षक एम.श्रीनिवास राव, मुख्य महाव्यवस्थापक एफडीसीएम संजीव गौड, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, नरेश झुरमुरे, कल्याणकुमार, मुख्य वन संरक्षक अमरावती ज्योती बॅनर्जी, मुख्य वन संरक्षक नागपूर श्री लक्ष्मी ए, वनसंरक्षक यवतमाळ वसंत घुले, फिल्ड डायरेक्टर आदर्श रेड्डी, विभागाचे अधिकारी, महिला अधिकारी व कर्मचारी आदींची यावेळी उपस्थिती होती.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, ‘महाराष्ट्र शासनामध्ये प्रमुख पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. वनविभागाच्या प्रमुख पदीदेखील शोमिता विश्वास असल्याबाबत नामोल्लेख केला. याचा मनापासून आनंद झाला. महाराष्ट्र हा देशात सर्वाधिक हरितक्षेत्र असलेला प्रदेश असल्याचा अभिमान आहे. यासाठी आपल्यासारख्या महिला अधिकाऱ्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. वृक्ष लागवड असो, वन्यजीव संरक्षण असो कि मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याचे आव्हान वनविभागातील महिला अधिकारी आणि कर्मचारी कुठेही कमी पडलेल्या नाहीत. महिला म्हणून विशेष सवलत मिळविण्यापेक्षा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तितक्याच गतीने काम करणाऱ्या वन विभागातील महिला कर्मचारी आणि अधिकारी निश्चितच सर्वांसाठी आदर्श आहेत.’ 

*हे तर ईश्वरीय कार्य*
वनविभागाचे कार्य हे ईश्वरीय कार्य आहे. वनविभाग हा आमच्यासाठी एक केवळ विभाग नसून ही एक फॅमिली आहे. सर्वांनी परिवार समजून कार्य केलं पाहिजे. महिला अधिकारी आणि कर्मचारी परिषदेमधून चर्चा आणि संवाद वाढावा यासाठी दरवर्षी अशा परिषदेचे आयोजन करावे. सोबतच महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी विभागीय स्तरावर व राज्यस्तरावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचनाही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

Comments