*अनाधिकृत जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने ‘त्या’चार शेतकऱ्यांचा मृत्यू**महावितरणच्या जनसंपर्क कार्यालयाचे स्पष्टीकरण*

*अनाधिकृत जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने ‘त्या’चार शेतकऱ्यांचा मृत्यू*
*महावितरणच्या जनसंपर्क कार्यालयाचे स्पष्टीकरण*

अकूंश अवथे चंद्रपूर 

चंद्रपूर, दि. 12 : महावितरण ब्रह्मपुरी उपविभाग अंतर्गत येणाऱ्या मेंडकी वीज वितरण केंद्रातील मौजा गणेशपुर येथे चार शेतकऱ्यांचा अनाधिकृत जिवंत तारांच्या स्पर्शाने मृत्यु झाला, असे महावितरण कंपनीने स्पष्ट केले आहे. 
अपघाताची माहिती मिळताच महावितरणच्या अधिकारी – कर्मचा-यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, 11 सप्टेंबर 2024 रोजी अंदाजे सकाळी 9.30 वाजताच्या दरम्यान नानाजी राऊत यांच्या शेतामध्ये वन्यप्राण्यांपासून शेतीचे होणारे नुकसान किंवा वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी कुंपणाची तार लावण्याचे काम सुरू होते. सदर कुंपण तार अंदाजे एक किलोमीटरचा असून संपूर्ण शेताला कुंपण करत असताना शेताच्या एका कोपऱ्यामध्ये असलेल्या लघुदाब वहिनी वर अनाधिकृत 3 पी.एच केबल वायरचा वापर करण्यात आला. सदर केबल वायरला हाताने ओढत असलेल्या जी.आय. ताराचे घर्षण झाल्याने केबलवरील इन्सुलेशन निघाले. कुंपणासाठी वापरण्यात येणाऱ्या ताराला पकडून ओढत असताना शेतक-यांना करंट लागला आणि चार जणांचा दुर्देवी मृत्यु झाला. 
तसेच त्यापैकी एका शेतकऱ्याच्या हाताला भाजले व तो मागच्या बाजूला पडला त्यामुळे किरकोळ जखमी झाला. एलटी पोल वरून आलेली 3 पी.एच. केबल वायर हे अनधिकृत वीज पुरवठा करण्यासाठी वापरण्यात येत होती. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी त्याच्या कुंपणात वीज पुरवठा सोडण्याच्या प्रकारातून तर ही दुर्घटना घडली नसावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. महावितरण लाईनचा यात कुठल्याही प्रकारचा संपर्क आलेला नाही. याबाबत महावितरण व पोलिस खात्यातर्फे चौकशीचे काम सुरू आहे, असे महावितरण कंपनीच्या जनसंपर्क कार्यालयाने कळविले आहे.
००००००

Comments